हाती ज्यांच्या शून्य होते

संपादन: अरुण शेवते

ऋतुरंग प्रकाशन

/media/3o25fAezHS1J.JPG

पाने : ☀ 232 मुल्य (₹): 250.0

शुन्यातुन ... यशाकडे - अरुण शेवते

हे माहीत आहे का तुम्हाला, की आमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन हे आधी पोस्टमास्तर होते; द ग्रेट शेक्सपिअर खाटिकखान्यात नोकरी करीत असे; गुलजार मोटार गॅरेजमध्ये काम करायचे आणी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूरच्या कोर्टात शिपाई होते. या आणि अशा मोठ्या व्यक्तींच्या रोमांचकारी आयुष्याची माहिती या पुस्तकातून मिळते. या सगळ्यांनीच शून्यातून विश्व घडविले. थोर गायक सुधीर फडके यांचा चहा-भाजीचा व्यावसाय होता. प्रख्यात चित्रपट अभिनेते निळू फुले यांनी ११ वर्षे माळीकाम केले होते. तर चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी मुंबईच्या फुटपाथावर सिनेमाची पोस्टर्स रंगविण्याचे काम केले होते. या सगळ्यांनीच परिस्थितीशी झगडत, दारिद्र्याची चटके सोसत अतुलनीय यश मिळवले होते. त्यांच्या कहाण्या मुळातूनच वाचाव्या अशा.

मनोगत

ए.पी.जे. अब्दुल कलाम
वडील नावाडी होते. विद्यार्थिदषेत असताना ते रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्र विकत होते.ते शास्त्रज्ञ झाले.भारताचे राष्ट्रपती झाले.

शेक्सपिअर
खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभाळता सांभाळता एका नाटककाराचा जन्म झाला.

लता मंगेशकर
वडील वारल्यावर त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी केली. कष्टात दिवस काढले. घर सांभाळले. विविध भाषेत पन्नास हजार गाणी म्हटली. भारतरत्न हा त्यांना सर्वोच्च किताब मिळाला.

ग. दि. माडगूळकर
मॅट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. त्यांनी गीतरामायण लिहिले.

गुलजार
फाळणीनंतर दिल्लीला आले. दिल्लीहून मुंबईला आले. मोटार गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल रॉय भेटले. मोटार गॅरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रीत आले.

सुधीर फडके
चहा भाजीचा व्यापार करत होते. प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्यं विकावी लागली. भटकंतीतून त्यांनी सूर शोधला. ते गायक झाले, संगीतकार झाले.

निळू फुले
पुण्याला कॉलेजमध्ये अकरा वर्ष माळी होते. .झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले. नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले.

कर्तृत्ववान माणसाचे वैभव दिसते. त्या ऐश्वर्याच्या मागे दडलेला अंधार कुणाला दिसत नाही. अंधाराला छेद देऊनच माणसे मोठी होतात.

अब्राहम लिंकन
पोस्टमास्तर होते. ते . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी गुलामांना स्वातंत्र्य मिळवून दिले.

विष्णूपंत छत्रे
घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वत:च स्वत:चा मार्ग शोधला. भारतातील पहिली ग्रँड सर्कस निर्माण केली.

दारा सिंह
पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते. रानात गुरं चरायला घेऊन जात होते. गुरांना सांभाळता सांभाळता त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली. जगभर कुस्त्या जिंकल्या. चित्रपटात कामे केली. राज्यसभेत खासदार म्हणून जाताना त्यांच्या मनात एकच भावना असते-एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला.

एम. एफ. हुसेन
मुंबईच्या फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली. पुढच्या आयुष्यात त्यांची शांभर चित्रे हांभर कोटींना विकली गेली. भारतात चित्रकलेच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला.

कर्मवीर भाऊराव पाटील
कंदील आणि नांगराचे विक्रेते होते. कंदील नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली.

ग्रेटा गार्बो
गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला. तेराव्या वर्षी गरिबीमुळे शाळा सोडावी लागली. दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असतांना अचानक हॉलीवूडचे दरवाजे उघडले.

चार्ली चॅपलिन
प्रचंड गरिबी अनुभवली. विद्यार्थीदशोत फुले विकण्यापासून अनेक कामे केली. आपल्या विनोदाने जगभरच्या लोकांना हसवले.

सुशीलकुमार शिंदे
सोलापूरला कोर्टात शिपाई होते. कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

लक्ष्मणराव किर्लोस्कर
दहा वर्ष ड्रॉईंग टिचर होते. त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला.

यशवंतराव गडाख
अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते. मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले. वयाच्या पंचविशीत सोनईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली.

धीरुभाई अंबानी
वडील प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग ऑफिसात नोकरीला होता. स्वत: ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते. अशा वातावरणात त्यांनी स्वत:चे औद्योगिक साप्राज्य निर्माण केले.

स्टीव्ह जॉब्स
कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले.जगातल्या मोठ्या कॉम्प्युटर कंपन्यांपैकी एक 'अँपल'ची स्थापना केली.

सुनील दत्त
रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले.

जॉनी वाकर
बस कंडक्टर होता. प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकीटे लोकांनी घ्यायला सुरुवात केली. एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थिरावला.

महेमूद
ड्रायव्हर होता. चलती का नाम गाडी, सबसे बडा रुपय्या त्याने म्हणायला सुरुवात केली. आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वत:लाही समजले नाही.

या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शून्य होते. त्यांनी अथक परिश्रमाने शून्यातून विश्व निर्माण केले. अनवाणी आयुष्याला आकार दिला. परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसांपुढे आदर्श ठेवला. तुम्हीसुद्धा हाती शून्य असताना स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण करू शकता.

द्वारा : पुस्तकातुन साभार