शरदिन्दु बंद्योपाध्याय

शरदिन्दु बंद्योपाध्याय

शरदिन्दु बंद्योपाध्याय (इ.स.१८९९-१९७०) हे एक बंगाली भाषेत लिहिणारे लेखक व कवी होते. यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे ३० मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बी.ए.पर्यंतचे कॉलेज शिक्षण कलकता येथील विद्यासागर महाविद्यालयात झाले. कॉलेजात असतानाच त्यांचा पहिला काव्यसंग्रह ’जौबन स्मृति’ १९१९साली प्रकाशित झाला. पाटणा शहरात राहून केलेला कायदेशास्त्राचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मात्र, त्यांनी पूर्णवेळ लेखनास वाहून घेतले. त्यांनी ’व्योमकेश बक्षी’ नावाचा डिटेक्टिव्ह नायक असलेल्या ’व्योमकेश बक्षी’ गुप्तहेरकथा लिहिल्या आहेत.

शरदिन्दु बंद्योपाध्याय यांच्या अन्य विषयांवरील ललितकथा गाजत असतानाच, त्यांची पहिली ’व्योमकेश बक्षी‘ कथा १९३२साली प्रसिद्ध झाली. तिचे नाव ’पाथेर कांटा’. ही ’वसुमती’ मासिकात छापून आली, तर दुसरी ’सत्यान्वेषी’ नामक कथा १९३३मध्ये छापली गेली. पुढील ३५ वर्षांत त्यांनी आणखी ३० ’व्योमकेश बक्षी’ कथा लिहिल्या. त्यांमध्ये काही कादंबऱ्यांचाही समावेश आहे. बंगालीत या रहस्यकथा अतिशय लोकप्रिय झाल्या. या कथांचे दूरचित्रवाणीवरही सादरीकरण झाले आहे, त्यामुळे शरदिंदु बंडोपाध्याय साऱ्या भारताला माहीत झाले..

१९३८मध्ये शरदिंदु मुंबईला आले आणि ’बॉम्बे टॉकीज’ व नंतर अन्य कंपन्यांसाठी ते पटकथा लिहू लागले. १९५२ला मुंबईत असेपर्यंत त्यांनी पटकथा लिहिल्या आणि नंतर ते पुण्याला आले आणि मरेपर्यंत तेथेच राहिले. पुण्यात राहत असताना ते भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा, आणि बालकथा आदी ललित साहित्यही लिहीत होते. मात्र त्यांचे मूळ लेखन बंगालीत असे.

’व्योमकेश बक्षी’ रहस्यकथांचे इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. मराठीतले अनुवाद अशोक जैन यांनी केले आहेत. त्यांनी व्योमेकेश कथा तीन भागांत प्रसिद्ध केल्या आहेत. पहिल्या भागात चित्रचोर आणि प्राणिसंग्रहालय या लघुकादंबऱ्या, दुसऱ्या भागात काटेरी रहस्य, जीवघेणी ज्वाळा-पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, टॅरंटुलाचं विष, आणि मृत्युपत्राने घेतला बळी या कथा, तर तिसऱ्या भागात अदृश्य शाई, कंठाहाराचे रहस्य, सत्यान्वेषी, आणि सालिंदराचा काटा या चार कथा आहेत.

शरदिन्दु बंद्योपाध्याय याचे निधन पुणे शहरात २२ सप्टेंबर १९७० रोजी झाले.

Books By शरदिन्दु बंद्योपाध्याय