‘नरकातला स्वर्ग’- पुस्तक परिचय
संप्रति१ on 20 May, 2025 – 14:45
तुरुंगवासातील अनुभवांवर बेतलेली काही चांगली पुस्तकं; उदाहरणार्थ दोस्तोवस्कीचं ‘द हाऊस ऑफ डेड्स’, कोबाड गांधींचं ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’, अज्ञेय यांचं ‘शेखर एक जीवनी’, बु-हान सोनमेझ यांचं ‘इस्तंबूल इस्तंबूल’, कोसलरचं ‘डार्कनेस ॲट नून’ अशी काही प्रतिभावंत लेखकांची पुस्तकं वाचनात आली होती.
या पार्श्वभूमीवर अलीकडे आलेलं संजय राऊत यांचं ‘नरकातला स्वर्ग’ वाचलं. अनपेक्षितरीत्या हे एक चांगलं वाचनीय पुस्तक आहे, असं वाटलं. एरव्ही टीव्हीवर बाईट्स देणाऱ्या राऊतांचे इतर वेगवेगळे पैलू यात दिसतात. वर्तमानपत्रीय अल्पजीवी लिखाणाहून अधिक गांभीर्याने केलेलं हे आत्मवृत्तपर निवेदन आहे.
एकूण दोनशे चाळीस पानांपैकी, सुरूवातीच्या नव्वद पानांमध्ये अटकेच्या आधीच्या पडद्याआडच्या घडामोडी, ज्यामध्ये ईडीच्या रेड्स, चौकशीसत्रं, प्रश्नोत्तरं, तपास अधिकाऱ्यांची मेंटॅलिटी-अगतिकता, फोनाफोनी हे सगळं थेट नावानिशी आहे. हा भाग रोचक, थरारक आणि वेगवान आहे. ईडीच्या चौकशीला आणि ईडीला भस्मासुर बनवणाऱ्या पीएमएलए कायद्याला नेते नक्की का घाबरतात,(आणि सत्ताशरण होतात), हे या भागातून लक्षात येण्यासारखं आहे.
त्यानंतरच्या उर्वरित भागांमध्ये आठ दिवसांची ईडीची कोठडी आणि नंतर ऑर्थर रोडमधील शंभर दिवसांचा मुक्काम, याबद्दलचे अनुभव, किस्से, संवाद आहेत. डायरी फॉर्मॅटमधल्या काही नोंदी आहेत.
आपल्या तुरुंगांमधली परिस्थिती/व्यवस्था भयाण हादरवणारी आहे. अंडर ट्रायल कैदी, सिस्टीमच्या अक्षम्य बेपर्वाईमुळे वर्षानुवर्षे विनाकारण खितपत पडलेले बंदी, अमानवी कोंडवाडे, भ्रष्टाचाराची बजबजपुरी, माफिया-ड्रग्ज-रॅकेट्स, अजूनही आउटडेटेड ब्रिटिशकालीन जेल मॅन्युअलनुसार चाललेल्या सिस्टीम्स, यांबद्दलची राऊत यांची निरीक्षणं एक अनुभवी पत्रकार प्राप्त परिस्थितीत भवतालाकडे कसा बघतो, याची साक्ष देणारी आहेत. संवेदनशील मानवी निरीक्षणं आहेत ही. सक्तीच्या एकांतवासाचं रूपांतर लिहिण्यासारख्या सर्जक कृतीत करणं, त्यांना जमलेलं दिसतं. या पुस्तकाच्या निमित्ताने जेल्समधील परिस्थितीत सुधारणांच्या दिशेने किंचित जरी पाऊल पडलं तर पुस्तक सार्थकी लागलं, असं म्हणता येईल.
जेल ही काही चांगली जागा नाही. जीवन खडतर, काळ कटत नाही. मनाची बैठक मोडून पडते. पोटाची/प्रकृतीची प्रचंड आबाळ होते आणि त्याचे दुष्परिणाम पुढे आयुष्यभर भोगावे लागतात. घालमेल, असुरक्षितता, एकटेपणा, कौटुंबिक चिंता माणसाला आतून बाहेरून पोखरून काढतात. मानखंडनेचे प्रसंग वारंवार येतात, डिग्निटी राहत नाही. भल्याभल्यांची हेकडी उतरते. हे सगळं डोळसपणे स्वीकारत त्याबद्दल लेखकीय तटस्थतेनं लिहिणं राऊत यांना बऱ्यापैकी साधलेलं आहे. त्यांनी मूळ खेळ ओळखलेला आहे. हे सगळं त्यांना टाळता येण्याजोगं होतं. गप्प बसण्याचा पर्याय त्यांच्यापुढेही होताच. तरीही त्यांनी ठरवून या संकटात उडी घेतलेली दिसते. नुसत्या कोरड्या डरकाळ्या फोडायच्या आणि खरोखरीचा वेळप्रसंग आला की पळून जायचं, हे केलं नाही. त्यामुळे वैयक्तिक त्रासांचं भांडवल करण्यापेक्षा, किंवा उगाच गा-हाणी मांडून वाचकांना उबग आणण्याऐवजी, ते यामध्ये अधिक महत्त्वाच्या इश्श्यूंकडे लक्ष वेधताना दिसतात.
‘पत्रास कारण की..’ या भागात त्यांच्या मुलींशी त्यांचे पत्रसंवाद यात छापलेले आहेत. एरव्ही न दिसलेल्या, ‘फॅमिली मॅन’ राऊतांची झलक या पत्रांतून मिळते. आपण एकदम डॅशिंग आहोत असं बेअरिंग घेऊन वावरले तरीही, एक-दोन ठिकाणी ते वाचकाच्या भावनांना स्पर्श करण्यात आश्चर्यकारकरित्या यशस्वी झालेले आहेत. शेवटाकडे जाताना पुस्तक पुन्हा एकदा वेग पकडतं. कोर्टरूम ड्रामा, वातावरणातला तणाव, अनिश्चितता, सुटकेचा क्षण, हे त्यांनी प्रोफेशनल लेखकासारखं उभं केलं आहे.
राजकारणी माणसांना पुस्तक लिहिता येत नाही, अनुभव शब्दांत नीट बांधता येत नाहीत. लिहिलं तरीही ते फार सावधगिरी बाळगून फायद्यातोट्याचा हिशेब बघून लिहितात, किंवा घोस्ट रायटर्सकडून लिहून घेतात, असे काही योग्य समज आहेत. समकालीन महाराष्ट्रात यशवंतराव गडाखांसारखे क्वचितच एखादे राजकारणी आहेत, ज्यांनी फार चांगली आत्मवृत्तपर पुस्तकं लिहून हे समज खोडून काढले आहेत. याबाबतीत राऊत यांचं हे पुस्तक आणखी एक अपवाद म्हणता येईल. सदर पुस्तक लेखक म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा उंचावणारं आहे. (राजकारणी माणसांच्या मानाने राऊत यांचं वाचन बरंच चांगलं आहेसं दिसतं. शिवाय दांडगा लोकसंपर्क आणि अस्सल जीवनानुभव आहेत. एक रसरशीत, हॅपनिंग आयुष्य ते जगलेले आहेत. भविष्यात त्यांनी आणखी आत्मवृत्तपर पुस्तकं लिहायचं मनावर घ्यायला हवं. मराठी साहित्याला झालेला त्याचत्याच मिडलक्लास शिळेपणाचा संसर्ग दूर होऊन थोड्याफार झणझणीत फोडण्या मिळाल्या तर बरंच आहे.)
राऊत यांच्याकडे चांगलाच ‘मारक’ असा सेन्स ऑफ ह्युमर आहे. आणि पुस्तकात त्याचा सढळ हाताने वापर करण्यास त्यांनी मागे-पुढे पाहिलेलं नाही. पुस्तकात बऱ्याच अशा ‘जागा’ आहेत, ज्यामुळे वाचता वाचता फाटकन् हसू फुटतं. डिप्रेसिंग परिस्थितीत तग धरून राहण्यामागे त्यांच्या या तल्ख विनोदबुद्धीचा मोलाचा वाटा असावा, अशी शंका येते.!
लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा छाप लिहिण्याच्या शैलीत ठळकपणे उतरलेला दिसतो. पुस्तकाचा टोन ‘बोलका’/ ‘संवादी’ आहे. हे ‘बोलण्याच्या शैलीत’ लिहिलं गेलं आहे. कृत्रिम साहित्यिक अभिनिवेश टाळून, ज्या टोकदार भाषेवर त्यांची जडणघडण झालेली आहे, ती भाषा नैसर्गिकपणे यात आलेली आहे. (यावर आता कुणी म्हणेल की ‘राऊत तसलेच आहेत! ‘. तर होय. तसंही असू शकतं. पण या कारणास्तव एखादं पुस्तक न वाचताच ते निकालात काढणं योग्य नाही, हे ही खरं आहे.)
सत्तेचं दमनचक्र अंगावर घेताना कुठल्या टोकाला जायची तयारी ठेवली पाहिजे, याअनुषंगाने या पुस्तकातील अनुभव विरोधी नेत्यांना महत्वाचे ठरतील. भले ते नेते/सामाजिक कार्यकर्ते कुठल्याही विचाराचे, कुठल्याही राज्यातले, कुठल्याही देशातले, कुठल्याही काळातले असोत.
सोशल मिडियाच्या महापुरात, न्युजचॅनेल्सच्या मासळीबाजारात रोज कोण काय बोललं हे वाहून जातं. ते टिकत नाही. पुस्तकं टिकतात. हे पुस्तक एका अर्थाने आजच्या राजकीय संस्कृतीचं डॉक्युमेंटेशन आहे. भविष्यात तीसचाळीस वर्षांनंतरच्या पिढीला आजच्या सर्वंकष सत्तेची व तपासयंत्रणांच्या वेपनायझेशनची कार्यप्रणाली समजून घ्यावीशी वाटली, तर त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. (जसं की ‘घोषित’ आणीबाणीच्या काळातील तुरूंगवास-राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी विनय हर्डीकरांचं ‘जनांचा प्रवाहो चालिला’, हे पुस्तक आज पन्नास वर्षांनंतरही उपयोगी ठरतं.)