ारतीय नौका नयनाचा इतिहास

‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ – डॉ. द. रा. केतकर

Share...

 ‘सिंदिया स्टीम नेव्हिगेशन’ ही २० व्या शतकाच्या पूर्वार्धातली स्वातंत्र्यपूर्व काळातली प्रवासी आणि मालवाहतूक करणारी स्वदेशी कंपनी. तिची स्थापना झाली १९१९ साली. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांनी तिची स्थापना केली असणार, असा समज नावावरून झालेला. पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. मराठी उद्योजक वालचंद हिराचंद यांनी आपल्या उद्योजक मित्रांसमवेत ग्वाल्हेरच्या महाराजांचे ‘लॉयल्टी’ हे जहाज विकत घेतले आणि नौकानयन व्यवसायात उडी घेतली. त्यांना बराच काळ तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अडवणुकीचा सामना करावा लागला.

वालचंद हिराचंद यांच्या आधी उद्योगपती नसरवानजी टाटा, मद्रासचे लोकमान्य टिळकांचे अनुयायी चिदंबरम आणि रवींद्रनाथ टागोरांचे बंधू ज्योतींद्रनाथ टागोर यांना देखील जहाज कंपन्या सुरु केल्यानंतर ब्रिटिशांच्या अडवणुकीच्या धोरणांचा सामना करावा लागला. परिणामी या सर्व स्वदेशी जहाज कंपन्या 3 ते ४ वर्षात बंद पडल्या. वालचंद हिराचंद आणि त्यांचे सहकारी यांनी मात्र ‘सिंदिया स्टीम’ नेटाने चालविली. वरील सर्व माहिती तसेच या कंपन्या का बंद पडल्या, ब्रिटिश सरकारचे एतद्देशीय जलवाहतूक कंपन्यासंबंधी काय धोरण होते; सिंदियाचे इतर भागिदार कोण होते, हे जाणून घ्यायचे असेल तर ‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ हे डॉ. द. रा. केतकर यांचे पुस्तक आपल्या मदतीला येते.

डॉ. केतकरांनी ‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ प्राचीन काळ, मराठा आरमार (मध्ययुगीन कालखंड) आणि ब्रिटिश साम्राज्य काळ (म्हणजेच पेशवाई अस्ताला गेल्यानंतर साधारणपणे १८१८ ते १९४७ स्वातंत्र्य मिळेपर्यंत ) अशा तीन भागात मांडला आहे. सिंदिया स्टीम आणि इतर कंपन्यांसंबंधी विस्तृत माहिती वाचकाला तिसऱ्या भागात मिळते.

ग्रंथाच्या पहिल्या भागात प्राचीन सिंधू संस्कृतीच्या काळात इजिप्त, ग्रीस या देशांबरोबर चालू असलेल्या व्यापाराचा उल्लेख आहे. लोथल या हरप्पाकालीन बंदराचा त्यांनी उल्लेख केला आहे. रामायणात चीनचा उल्लेख आहे असे ते सांगतात. इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्हणजेच इ. स. ६५ मध्ये शैलेंद्र कौंडिण्य नावाचा धाडसी तरुण दक्षिण भारतातून सागर प्रवासाला निघाला. इंडोनेशिया गाठल्यावर तो उत्तरेकडे वळला आणि कंबोडियाच्या किनाऱ्याला लागला. त्याने तिथे आपले राज्य स्थापन केले. याच सुमारास किंवा मागे पुढे दक्षिण भारतातल्या बलाढ्य अशा चोला राजांनी दक्षिण पूर्व आशियातल्या प्रदेशात वसाहती केल्या. थायलंड, इंडोनेशिया, लाओस, व्हिएतनाम ही ती राष्ट्रे. भारतीय नाविकांचा हा प्रवास सुरु होतो तो सिंधू संस्कृतीपासून, याच काळात दक्षिण भारतीय व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने जगभरात गेले होते, अगदी न्युझीलंड, दक्षिण अमेरिकेपर्यंत, असे डॉ. केतकर सांगतात. या व्यापारामुळेच बायबलमध्ये हस्तिदंत, मोर, माकड अशा अनेक तमिळ शब्दांची भ्रष्ट रूपे आढळतात. हा व्यापार तमिळनाडू मधून होत असे हे त्याचे कारण.

भारतीयांच्या देशाबाहेरील जलप्रवासाचा उल्लेख जातककथांमध्ये आहे हे आपल्याला नव्याने समजते. कच्छी, गुजराती, तांडेलानी ‘मालीमनी पोथी’ लिहून ठेवली आहे. या पोथीमध्ये पाण्याची खोली, वाऱ्याची दिशा, शिडांचा उपयोग इत्यादिची, अनुभव आणि निरीक्षणाअंती मिळालेल्या ज्ञानाची नोंद आहे. या संदर्भातली जहाजांची, नाण्यांची, स्तूपातील शिल्पांची चित्रे पुस्तकात आहेत, पण ती दृश्य आणि स्पष्ट नाहीत, तसेच योग्य तो संदर्भ नसल्यामुळे काही वाक्यांचे पटकन आकलन होत नाही. उदा. पृष्ठ ४६ वर एक उल्लेख आहे ‘द्राविडी व्यापारामुळे ग्रीक व्यापारी ४० दिवसात मुझारिस येथे जहाजांनी येत.’ आता हे मुझारिस कुठे हा प्रश्न वाचकांना पडू शकतो. त्याचा उलगडा पान ७२ वर होतो. तिथे कळते मुझारिस, मुचिरीस हे केरळ मधील बंदर होते.

भारतीय नौकानयनाच्या इतिहासातला प्राचीन काळ म्हणजे सुवर्णयुग. अर्थात या सर्व प्रवासाविषयी फार त्रोटक माहिती उपलब्ध आहे. ‘नौकाशास्त्र’ या ग्रंथात हे ज्ञान उपलब्ध होते. पण आता तो ग्रंथच उपलब्ध नाही असे डॉ.केतकर सांगतात. सातवाहनकालीन नाणी, लेण्यांमधील जहाजांची शिल्पे, तांडेला(मालीम)ची १७०० सालातली ‘मालीमनी पोथी’ या सर्वांचा मागोवा घेऊन डॉ. केतकर यांनी पहिला भाग लिहिला आहे.

दुसरा भाग – मराठा आरमारा विषयी आहे, याच्या पूर्वार्धात डॉ. केतकरांनी केरळचा राजा झामोरीन आणि वास्को द गामा यांच्यातला संघर्ष, सागरी युद्धे, वास्को द गामाचे क्रोर्य वर्णन केले आहे. त्यानंतर सुरू होतो मराठा कालखंड ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र’ हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजीमहाराजांनी केलेली आरमाराची स्थापना. हे आरमार अधिक बलदंड केले ते सरखेल कान्होजी आंग्रे यांनी आणि त्यानंतर पेशव्यांनी स्वत:च्या हातांनी मराठा आरमाराला लावलेली चूड, हा सर्व इतिहास या प्रकरणात वाचकाला समजतो. अर्थात मराठा आरमाराचा समग्र इतिहास कथन करणारे डॉ. सचिन पेंडसे यांचे ‘मराठा आरमार एक अनोखे पर्व’, गजाजन भास्कर मेहेंदळे आणि संतोष शिंत्रे यांचे ‘शिवछत्रपतींचे आरमार’, मनोहर माळगावकार लिखित आणि पु.ल.देशपांडे अनुवादित ‘कान्होजी आंग्रे’ तसेच खुद्द डॉ. केतकरांचे ‘सरखेल कान्होजी आंग्रे मराठा आरमार’ हे ग्रंथ मराठा आरमाराविषयी अधिक सखोल माहिती, उत्तम चित्रे देतात. मराठा कालखंडात जखमी दर्यावर्दीना पेन्शन अथवा त्यांच्या मुलांना नोकरी दिली जात असे. तसेच लढाईत मृत्युमुखी पडलेल्या नौसेनिकांच्या विधवा स्त्रियांना पेन्शन मिळे, असे डॉ. केतकर लिहितात (शिवछत्रपतींच्या काळातही मृत सैनिकांच्या मुलांना रायगडावर ठेवून त्यांचा सांभाळ केला जाई.).

तिसऱ्या भागात – ब्रिटिश साम्राज्याच्या अस्तापर्यंतचा म्हणजे १९४७ पर्यंतचा लढाऊ नौका, नौसेना प्रवासी जलवाहतुकीचा इतिहास आलाय. ब्रिटिशांचे भारतीय जहाज व्यवसायासंबंधीचे सापत्न भाव, छळवणुकीच्या अडवणुकीच्या धोरणाचा परामर्श यात डॉ. केतकरांनी घेतला आहे. या विभागातले जागतिक लढायांसंदर्भातले परिशिष्ट दोन महायुद्धांविषयी माहिती देते, पण भारतीय नौकानयनाच्या इतिहासाशी त्याचा मेळ कसा घालायचा असा प्रश्न वाचकाला पडू शकतो. याच परिशिष्टात एमडेन नौका व तिचा कप्तान व्हॉन म्युलरच्या सागरी हालचालीचा आढावा घेतला आहे. मात्र एमडेन कुठल्या राष्ट्राची युद्धनौका आहे, तिचा कप्तान व्हॉन म्युलर हा सागरी चाचा आहे की आणखी कुणी हे पटकन लक्षात येत नाही.

मात्र डॉ. केतकरांनी अतिशय परिश्रमपूर्वक हा ग्रंथ निर्माण केला आहे. भारतीय नौकानयनाचा स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतचा समग्र इतिहास या एका ग्रंथात अभ्यासकाला मिळतो. त्यामुळे संदर्भ ग्रंथ म्हणून याचे मोल जास्त आहे.

लेखक : डॉ. द. रा. केतकर

पृष्ठं : २९६

किंमत : ४००रु.


Share...
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *