साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर

Share...

कुरुंदकर यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर गावात झाला होता. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव होते. 1932 ते 1982 असे जेमतेम 50 वर्षांचेचे आयुष्य नरहर कुरुंदकर यांना लाभले होते. परंतू येवढ्या काळात त्यांच्या हातून वैचारीक लिखाणाचे मोठे काम झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथं त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. लहान वयातच त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहबाग घेतला होता. या लढ्याच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहता आलं. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी कविता केली आणि एका नियतकालिकाला पाठवली. त्यांना वाटलं पुढच्या अंकात ती छापून येईल. पण आली नाही. तेव्हापासून ते नियमित लिहून नियतकालिकांना आपले लेख साहित्य पाठवू लागले. त्यांचा पहिला लेख त्यांच्याच मामांनी छापला होता. पहिला लेख छापून येण्यासाठी त्यांना 10 ते11 वर्षं लागली. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहावं लागलं नाही.

नरहर कुरुंदकरांवर कुणी लिहावं? माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने लिहावं की लिहू नये? खरंतर असे प्रश्न पडण्याची मुळात गरजच नाही. कृतज्ञता व्यक्त करायला असले उपचार हवेतच कशाला? कुरुंदकरांनी मला जे भरभरुन दिलं त्याचं ऋण तर मानता येईल. ते फेडणं तर केवळ अशक्य आहे. वैचारीक वाचनाची आवड निर्माण झाल्यावर कुरुंदकरांच्या लिखाणाकडे मन झुकलं. त्यांचं पहीलं पुस्तक कुठलं वाचलं ते आठवत नाही मात्र रणजित देसाईंच्या “श्रीमान योगी” ला लिहीलेल्या प्रस्तावनेचा ठसा खोल उमटला होता. त्यानंतर कुरुंदकरांचं व्यसनच जडलं. मिळतील ती पुस्तकं वाचत गेलो. सर्वच कळली नाहीत. काही पुस्तकं कालांतराने कळु लागली. बरीचशी पुस्तकं उपलब्ध नव्हती. मिळाली ती विकत घेतली. पुन्हा पुन्हा वाचण्याचा परिपाठ ठेवला. सर्वप्रथम काही जाणवलं असेल तर ती धारदार, शुचिर्भूत शैली, निळ्या धारेच्या सुरीसारखी, आणि तरीही सुंदर. सत्य सत्य म्हणतात त्याचं स्वरुप हेच असावं. निर्भयतेचा साक्षात्कार घडवणारी लेखणी.

कुरुंदकरांवरचा मार्क्सवादाचा प्रभाव, तरीही त्यांची लोकशाहीवरील अढळ श्रद्धा या बाबी मी फारशा विचारात घेतल्या नाहीत. त्यांचे बिनतोड तर्क वापरुन काढलेले निष्कर्ष मला जास्त महत्त्वाचे वाटले. आजही वाटतात. विचारसरणी कुठलीही असो जर पुरावे पक्के असतील, युक्तीवाद भक्कम असेल तर समोर आलेलं सत्य कितीही कडवट असो मान्य करायला हवं हीच गोष्ट मी सर्वप्रथम कुरुंदकरांकडून शिकलो. माझ्या अनेक श्रद्धास्थानांना कुरुंदकरांच्या लिखाणामुळे धक्का बसला. काहीवेळा तो पचवणं जडही गेलं पण दुसरा इलाज नव्हता. कुरुंदकर प्रत्येक मुद्दा आपल्या असामान्य बुद्धीने क्ष किरणाप्रमाणे भेदूना आरपार विवेचन करतात तेव्हा त्यांनी काढलेल्या निष्कर्षाशिवाय दुसरा काही निष्कर्ष निघूच शकणार नाही असं वाटत राहतं.

कुरुंदकरांच्या प्रत्येक विधानाला तर्क, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्म आणि कित्येक महत्त्वाच्या गोष्टींचा आधार असतो. कुठेही सैलसरपणा, चलाखी, दडपुन नेण्याची वृत्ती नाही, पुराव्याचा अभाव नाही, कुठलाही पुर्वग्रह नाही. ज्यांच्यावर कुरुंदकर प्रेम करतात त्यांच्या लेखनाचा परमर्ष घेतानाही ते झुकतं माप देत नाहीत. जिज्ञासूंनी यासाठी कुरुंदकरांचं गांधींवरील लेखन जरुर अभ्यासावं. डॉ. नांदापूरकर तर त्यांचे मामाच. त्यांच्या “मुक्त मयुरांची भारते” या प्रबंधावर लिहीताना अनेकदा कुरुंदकर हळवे झालेले दिसतात. मात्र तेथेही जी गोष्ट पटत नाही ती स्वच्छपणे लिहीण्यात कुरुंदकर चुकत नाहीत. मला कुरुंदकरांचा हा सर्वात मोठा, विलोभनीय गुण वाटतो. आणि त्यासाठी ते मला अक्षरशः प्रातस्मरणीय वाटतात हे सांगण्यात कसलीही अतिशयोक्ती नाही.

जागर, मागोवा, आकलन, भजन यांसारखी कुरुंदकरांची अनेक पुस्तके म्हणजे बुद्धीला प्रचंड खाद्यंच. त्यातलं बरचसं लिखाण आणि “रुपवेध” सारखी पुस्तकं मला अजुनही नीट कळलेली नाहीत. मात्र जे उमगलं त्याचं मोल करता येणार नाही. नेहरु, पटेल, गांधी, विनोबा, आंबेडकर, आ़झाद यांचं कुरुंदकरांनी केलेलं व्यक्तीचित्रण हे राजकीय निरीक्षण म्हणून तर अजोड आहेच पण भाषाशैलीच्या दृष्टीनेही अप्रतिम. कुरुंदकरांचं महाभारतावरील लिखाण हे आणखी एक सोन्याचं पान. डॉ. ईरावती कर्वेंच्या “युगान्त” वर लिहीताना कुरुंदकर अनेक मार्मिक मुद्यांचा उल्लेख करतात. महाभारतातील व्यक्तीरेखांवर लिहीताना त्यांचं भीष्मासंदर्भातील विवेचन वाचताना मूलगामी, स्वतंत्र प्रज्ञा म्हणजे काय याचा प्रत्यय येतो.

मला कुरुंदकरांच्या चौफेर पांडित्याबद्दल लिहीणं जमणार नाही. ती माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. तेव्हा कुरुंदकरांनी मला काय दिलं याचा उल्लेख करुन हे कृतज्ञतेचं पान पूर्ण करतो. कुरुंदकरांमुळे मला स्वच्छपणे उमगलं असेल ते हे की महान म्हणुन गणल्या गेलेल्या व्यक्तींच्याही जीवनाला एक क्रम असतो. त्यांचाही विकास होत असतो. त्याही बरेचदा जन्मजात महान नसतात. त्यांचेही आडाखे चुकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्ती या त्या विशिष्ठ काळाचं अपत्य असतात. त्यांनाही मर्यादा असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल अफाट आदर बाळगुनही आपले त्यांच्याशी मतभेद असु शकतात. कुरुंदकरांनी आपल्या लिखाणातुन हे नीट समजावून सांगीतल्याने माझा वैचारिक गोंधळ कमी झाला. स्वभावातला सनातनीपणा, कडवेपणा दूर झाला. आता मी बर्‍याच गोष्टींकडे उदारपणे पाहू शकतो. धर्माकडे चिकीत्सक दृष्टीने पाहण्याची सवय लागली. एखाद्या विचाराच्या चटकन प्रभावाखाली येणं बंद झालं. हे सारं कुरुंदकरांनी मला दिलं. त्याचं ऋण हे न फिटणारं आहे. माझ्यासारख्याला मात्र या ऋणातच राहण्यात आनंद आहे.

– अतुल ठाकुर,https://www.maayboli.com/node/50811

नरहरी कुरुंदकर यांचे प्रकाशित झालेले साहित्य

नरहरी कुरुंदकरांनी अनेक पुस्तके लिहली. तसेच व्यक्तिचित्रेही लिहली. त्याचबरोबर कुरुंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रदीर्घ प्रस्तावना देखील लिहिल्या आहेत. त्‍यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून आठ प्रस्तावनांची निवड करून ‘निवडक नरहर कुरुंदर’ हे संपादित पुस्तक आकाराला आलेले आहे. ‘देशमुख आणि कंपनी’ ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील प्रस्तावनांची निवड विश्वास दांडेकर यांनी केलेली आहे. 

  • अभयारण्य   
  • आकलन 
  • जागर 
  • थेंब अत्तराचे  
  • धार आणि काठ  
  • निवडक कुरंदकर ग्रंथवेध भाग १, २ (संपादक विश्वास दांडेकर) 
  • निवडक पत्रे-नरहर कुरुंदकर (संपादक- जया दडकर)   
  • पं.नेहरू-एक मागोवा (सहलेखक- डॉ. एन.जी. राजूरकर)   
  • परिचय   
  • पायवाट   
  • भजन   
  • मनुस्मृती (इंग्रजी)   
  • मागोवा  
  • रुपवेध  
  • रंगशाळा   
  • शिवरात्र   
  • छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य   
  • हैदराबाद : विमोचन आणि विसर्जन

यातील ‘ धार आणि काठ’ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *