• -100% dnyaneshwari

    ज्ञानेश्वरीची प्रस्तावना आणि ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण

    0

    संपादकीय निवेदन

    इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांची “ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरींतील मराठी भाषेचे व्याकरण’ हे दोन ग्रंथ इ. स. १९०९ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर इ. स. १९६० साली महाराष्ट्र राज्यश्ञासनाने त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’चे पुनर्मुद्रण केले; पण ते करताना त्यांनी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना वगळली. वरील दोन्ही प्रकरणे, म्हणजे प्रस्तावना व व्याकरण, मराठी भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला बहुमोल असून ती दुर्मिळ झाल्याने]त्यांची एक संपादित आवृत्ती काढावी या हेतूने प्रस्तुत ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. राजवाड्यांच्या मूळ प्रबंधांना तळटीपा, विषयसूची किंवा शब्दसूची यांची जोड नाही. ती येथे देऊन त्यांचे प्रबंध अधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्या प्रस्तावनेची व व्याकरणाची वैशिष्ट्ये सांगणारा एक विवेचक प्रस्तावही या जोडग्रंथास जोडला आहे. या कामी ‘साहित्य संस्कृती मंडळ’ने पुढाकार घेऊन हा ग्रंथ स्वतःचे प्रकाशन म्हणून प्रसिद्ध केला यासाठी मी ‘मंडळा’चा आभारी आहे.

    –  शं. गो. तुळपुळे , पुणें, ६ जून १९७८

    संपादकीय प्रस्तावना  राजवाडे-ज्ञानेश्वरी

    इतिहासाचार्य विश्वनाथ काश्लीनाथ राजवाडे यांनी त्यांना मराठवाड्यात बीड-पाटांगण येथे मिळालेली ज्ञानेश्वरीची पोथी तिला एक विस्तृत प्रस्तावना लिहून इ. स. १९०९ (शके १८३१) मध्ये प्रसिद्ध केली. त्याबरोबरच “ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण” हा आपला प्रबंधही त्यांनी त्याच वर्षी प्रसिद्ध केला. राजवाड्यांची ही ज्ञानेश्वरीची ‘प्रस्तावना’ व तिचे ‘व्याकरण’ त्यांच्या बुद्धिमत्तेची व व्यासंगाची साक्ष देत असून मराठी भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला त्यांचे वरील दोन्ही प्रबंध अमोल ठरले आहेत. ते प्रसिद्ध झाल्याला आता सत्तर वर्षे होत आली असून खुद्द राजवाड्यांना जाऊनही पन्नास वर्षे झाली आहेत. या कालावधीत मराठी भाषेचा अभ्यास पुष्कळच पुढे गेलेला असला तरी अजूनही राजवाड्यांची ‘ज्ञानेश्वरीची प्रस्तावना’ व त्यांचे ‘व्याकरण’ या जोडसाधनांचा उपयोग केल्यावाचून अभ्यासकाचे व संशोधकाचे पाऊल पुढे पडत नाही, इतके या दोन प्रबंधांचे महत्त्व आहे. आधुनिक भाषाभ्यासकांचा एक वर्ग राजवाड्यांच्या वरील कृतीकडे काहीशा उपेक्षेने पहात असतो हे खरे असले तरी ही परिस्थिती फार काळ टिकेल असे वाटत नाही. वर्णनात्मक (Descriptive)भाषाशास्त्राबरोबर ऐतिहासिक (Historical) भाषाशास्त्र म्हणून काही असते याची जाणीव जेव्हा आधुनिक अभ्यासकांना होईल– आणि ती हळूहळू होत आहे- तेव्हा या क्षेत्रात राजवाड्यांनी करून दाखविलेल्या कर्तृत्वाची यथार्थ कल्पना येऊन त्यांच्या ग्रंथाचे महत्त्व विद्वानांस अधिकाधिक पटत जाईल यात मुळीच शंका नाही. सध्या आपल्या या ‘जुन्या ठेवण्या’ वर काहीसे उपेक्षेचे सावट आले आहे, ही गोष्ट मात्र खरी. हे सावट दूर व्हावे व या प्रतिभावान्‌ भाषाक्ास्रज्ञाचे तेज पुन्हा उठून दिसावे हा प्रस्तुत संपादनामागील एक हेतू आहे.

    Digital Book

    Original price was: ₹90.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% तुकारामाचे अभंग

    श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा

    0

    निवेदन 

    पंढरपूरचा श्री विठ्ठल हा जसा आपल्या ‘विठोबा’ या मराठमोळ्या नावाने महाराष्ट्रीय समाजाच्या हृदयामध्ये अत्यंत आदरपूर्वक प्रस्थापित झाला आहे, त्याप्रमाणेच त्याचा परमभक्त संत तुकाराम यालाही महाराष्ट्राच्या मनामध्ये अद्वितीय आणि अलौकिक स्वरूपाचे स्थान मिळालेले आहे. मराठी भक्तजन श्री ज्ञानदेवांच्याबरोबरच संत तुकारामांनाही परमश्रध्येय मानतात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा उत्कट भावाने गजर करतात. श्री विठ्ठल, श्री नामदेव, संत तुकाराम ही महाराष्ट्राची आराध्य दैवते आहेत. श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या अजोड प्रतिभेने जज्ञी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच उत्कट भक्तीभावाने संत तुकारामांनी आपले अभंग लिहिले. तुकाराम हे महाराष्ट्रातील संत मंडळींचे शिरोभूषण मानले जातात. गेली साडेतीनशे वर्षे तुकारामांची गाथा महाराष्ट्राने हृदयाशी बाळगून आध्यात्मिक वाटचाल केली आहे.  

    जनसामान्यांना प्रिय असलेल्या संत तुकारामांची सकल गाथा प्रसिद्ध करून ती सर्वांना उपलब्ध करण्याचा निर्णय तत्कालीन मुंबई सरकारने १९५० साली घेतला आणि शासनामध्ये न्यायमूर्ती या उच्च पदावर काम करतानाही अंतरीचे काव्यगुण जोपासणाऱ्या आणि संत वाड्मयाचा प्रगाढ व्यासंग असलेल्या स्व. पुरुषोत्तम मंगेश लाड या विद्वान सनदी अधिकाऱ्याची गाथेच्या संपादनासाठी नियुक्ती केली. लाड हे स्वतः उत्तम कवी होते आणि त्यांचा संत वाड्मय आणि आधुनिक कविता यांचा विशेष अभ्यास होता. तुकारामांची गाथा संपादित करून प्रकाशित करण्याचे महत्‌ कार्य लाडांनी स्वीकारले आणि आपल्या अतिशय विवेचक आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह १९५० साली तुकारामांची गाथा शासनातर्फे प्रथम प्रकाशित झाली. तिचे वाचकांनी अभूतपूर्व स्वागत केले. १९५५ साली तुकाराम बीजेला गाथेची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर १९७३ साली तिसरी आवृत्ती शासनातर्फे प्रकाशित झाली आणि आता ती दुर्मीळ झालेली आहे.  

    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे श्री एकनाथी भागवत आणि श्री नामदेव गाथा हे दोन बहुमोल ग्रंथ पुन्हा प्रकाशित करण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे दुर्मीळ झालेली तुकारामांची गाथासुद्धा पुन्हा वाचकांना उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार १९५० साली प्रथम प्रकाशित झालेल्या गाथेच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा सुयोग सध्याच्या मंडळाला लाभलेला आहे. श्री नामदेव, श्री एकनाथ आणि संत तुकाराम यांचे वाड्मय महाराष्ट्राला पुन्हा अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्याची सुसंधी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. संत तुकारामांना विनम्र भावाने अभिवादन करून ही गाथा मी महाराष्ट्राच्या चरणी अर्पण करीत आहे.  मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. 

    Digital Book

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart